३० ऑक्टोबर, २०१२

"क्लिक!"


काही काही जाहिराती बघताक्षणीच आवडतात आणि मनात घर करून जातात. असंच काहीसं झालं जेव्हा मी नुकतीच एका कॅमेऱ्याची जाहिरात बघितली.....

              
                        आता फोटो काढणे किती सोपी गोष्ट झाली आहे नं? पण, काही वर्षांपूर्वी  जेव्हा अजून डिजिटल कॅमेरे आले नव्हते किंबहुना कॅमेरा ही एक चैन होती..तेव्हाचे फोटो किती खास असायचे. जपून, काळजीने काढलेले , योग्य क्षण कैद करण्यासाठी!! असे जुने फोटो बघायची इच्छा झाली आणि मी लगेच माळ्यावरची बॅग खाली काढली ज्यामध्ये सगळे जुने फोटो जपून ठेवले आहेत. एक एक फोटो पाहताना कितीतरी आठवणी ताज्या झाल्या.प्रत्येक फोटो , त्यातला प्रसंग, त्यावेळी केलेली धमाल...हे सारे आठवताना मी 'एलीस इन वंडरलॅंड' सारखी भूतकाळाच्या दुनियेत शिरले. हल्ली तंत्रज्ञान हातात जादूची कांडी घेवून उभे असताना हा सारा आनंद मी एकटीने कशाला साजरा करायला हवा?.....मी लगेच सारे फोटो दूर असलेल्या माझ्या भावा-बहिणींशी शेअर केले. ते जुने फोटो पाहून, ते क्षण आठवून नव्याने काहीतरी गवसल्याचा आनंद त्यांना झाला होता. सगळ्यांना हेच वाटत होते कि आपण किती छान छान आनंदाचे , सुखाचे क्षण जगलो......! अशा बऱ्याच गोष्टी ज्या कदाचित खूप साध्या होत्या पण खूप आनंद देवून गेल्या. त्या साऱ्या आठवल्या. हे सारे फोटो म्हणजे आमच्यासाठी  अनमोल ठेवा आहे. पुढे जर कधी आम्ही आयुष्यात दुःखी झालो, निराश झालो तर ते सारे क्षण आमच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवतील, जगण्याची नवी उमेद देतील...  


                                    किती साधे साधे प्रसंग होते ते. रंगपंचमीचे रंगाने माखलेले चेहरे, उन्हाळ्याच्या सुट्टीत पैज लावून खाल्लेले आंबे आणि एक तरी माझ्या बहिणीचा रडताना काढलेला फोटो...तिला त्या वेळी गाय पहायची होती आणि ती दिसली नाही म्हणून बाईसाहेबांनी भोकाड पसरले.. हे साधे क्षण आज किती अनोखे वाटतात. मनात विचार येतो, जर तेव्हाच कळाले असते कि हे साधे साधे वाटणारे क्षण आपल्या पुढच्या आयुष्यात इतके महत्वाचे ठरतील तर कदाचित आपण ते अजून जाणीवपूर्वक जगलो असतो. प्रत्येक गोष्ट जास्त आनंदाने साजरी केली असती.
             
                      खरे तर आपले त्या गोष्टीतील माणसासारखे झाले आहे. एक मनुष्य एका काच कापायच्या कारखान्यात काम करत असतो. त्याला एकदा एक बातमी कळते. " एक अतिशय श्रीमंत मनुष्य काही कामानिमित्त त्या कारखान्यात आलेला होता. त्याच्या हातातील घड्याळाला मौल्यवान असे हिरे जडलेले होते आणि त्यातला एक कारखान्याच्या स्क्रॅप टाकायच्या जागेत पडला. त्याने तो हिरा शोधायचा खूप प्रयत्न केला पण त्या काचेच्या तुकड्यांच्या डोंगराएवढ्या ढिगातून एक हिरा हुडकणे म्हणजे अशक्यच. शेवटी कंटाळून तो निघून गेला." झालं! हि बातमी म्हणजे त्या गरिबीने पिचलेल्या माणसाला अल्लाउद्दिनचा जादुई दिवा मिळाल्यासारखी वाटली. त्याने ठरवलं. आता काही झालं तरी तो हिरा शोधून काढायचाच! तहान-भूक विसरून तो कामाला लागला. प्रत्येक काचेचा तुकडा तो घ्यायचा, निरखायचा आणि मागे न बघताच टाकून द्यायचा. कित्येक दिवस त्याचा हाच क्रम चालू होता. समोरचा ढीग कमी होत होता आणि मागचा वाढत होता. शेवटी म्हणतात ना, 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे'. एके दिवशी त्याला तो हिरा सापडला. पण, आता परिस्थिती अशी झाली होती कि, इतके दिवस सतत एकच काम करून करून त्याला सवय झाली होती. त्यामुळे हिरा मिळाल्यावर त्याने  तो उचलला, बघितला आणि सवयीप्रमाणे मागे फेकून दिला.......नंतर जेव्हा त्याला याची जाणीव झाली तेव्हा त्याने मागे वळून बघितले तर काय?  काचेच्या तुकड्यांचा डोंगराएवढा  ढीग आणि त्यात तो हिरा कुठे पडला काहीच माहित नाही. म्हणजे आता त्या शोधमोहिमेचा पुन्हा श्रीगणेशा करावा लागणार. इतक्या दिवसांच्या कष्टाने आणि निराशेने तो इतका थकून गेला होता कि पुन्हा सारा ढीग नव्याने उपसण्याची त्याची इच्छा उरली नव्हती. अखेर हार मानून आपल्या नशिबाला दोष देत तो निघून गेला.
             
            आपलेही काहीसे असेच आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात हिऱ्यासारख्या मौल्यवान  क्षणांची वाट पाहत असतो आणि ते शोधता शोधता हाताला लागणारे खरे अनमोल क्षण काचेचे तुकडे म्हणून फेकून देत असतो. शेवटी जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा लक्षात येते कि, 'अरे, आपण काच म्हणून फेकून दिलेले तुकडेच खरे हिरे होते.' तेव्हा मात्र हळहळण्याखेरीज आपण दुसरे काही करू शकत नाही.
                 
              आपण ठरवतो येणाऱ्या वाढदिवसाला काय काय करायचं, सहलीला गेल्यावर तिथे कशी धमाल करायची... तेव्हा भरपूर आनंद लुटायचा!! पण, त्या गोष्टी केल्यावर आनंदी होऊ असे ठरवताना रोज मिळणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आनंदी होणे मात्र आपण विसरूनच जातो...काय माहित उद्या कदाचित असा काही प्रसंग घडेल ज्यामुळे आपण आपला वाढदिवस साजरा करू शकणार नाही किंवा सहलीला जाऊ शकणार नाही. मग आपण पुढच्या वर्षी येणाऱ्या वाढदिवसाची किंवा दुसऱ्या सहलीला जायची वाट बघत बसणार आनंदी होण्यासाठी? नाही ना! भविष्यात येणाऱ्या मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी आनंदी व्हायचे असे ठरवून वाट बघत बसण्यापेक्षा आपण रोज घडणाऱ्या लहान लहान गोष्टी जास्त आनंदाने साजऱ्या करूयात. म्हणजे जशी 'खुशियोंकि इंस्टौलमेंट ' म्हणा ना! सगळ्यांनी मिळून केलेली एखाद्या मित्राची फजिती, पावसात भिजून आल्यावर टपरीवर घेतलेला गरम गरम चहा आणि भजी, घरातल्या सगळ्यांसोबत बघितलेला एखादा सिनेमा,भावाची-बहिणीची केलेली थट्टा, विनाकारण केलेले भांडण........असे कितीतरी क्षण पूर्णपणे जगूया! मग जेव्हा आपण मागे वळून पाहू तेव्हा न ओळखता आलेले हिरे पाहून हळहळण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.............
                   
            हे सारे प्रसंग कॅमेऱ्यात कैद करून नाही ठेवता येणार आपल्याला कदाचित; परंतु ,निसर्गाने एक अद्भुत कॅमेरा दिलाय ना आपल्याला. स्मृतींचा!!! तो कॅमेरा वापरू, मन फोकस करू, आनंद झूम करू आणि म्हणू या सगळ्या आनंदी क्षणांना 
"क्लिक!" 
            

               पुढे  काही वर्षांनी जेव्हा आपण एखाद्या आराम खुर्चीवर रेलून , धूसर डोळ्यांनी भूतकाळातल्या कप्प्यात काही शोधायचा प्रयत्न करू तेव्हा क्लिक केलेला हा अल्बम आपल्या हाती लागेल. प्रत्येक फोटो आपल्याला पुन्हा त्या जादुई सफरीवर घेऊन जाईल. अलगद......तेव्हा कुठलीच खंत नसेल........कुठलीच बोच नसेल....सोबत साथीला असेल फक्त समाधान.......हे सारे क्षण पुरेपूर उपभोगल्याचे!!!!!!




               चला तर करूया फोकस ,झूम आणि म्हणूया  "क्लिक!" 
             
               
                   





१७ ऑक्टोबर, २०१२

शक्तिरुपेण संस्थिता।




                                  
     घट स्थापून जेव्हा जेव्हा पहिली माळ ओवली जाते, तेव्हा तेव्हा माझ्या मनात अभिमान दाटून येतो ...एक स्त्री असण्याचा.....नव्हे नव्हे ....एक लढवय्यी स्त्री असण्याचा! आणि हो स्त्रीच्या शूर आणि पराक्रमी प्रतिमेचे पूजन करणाऱ्या आपल्या संस्कृतीचाही .....
             वेद-पुराणांत  देवीची कितीतरी रूपे वर्णिली आहेत. प्रेमळ, यशदायिनी, बुद्धीदात्री परंतु हे नऊ दिवस आपण पूजा करतो ती रणरागिणीरुपी महिषासूरमर्दीनीची.
          प्रेम,माया, त्याग , स्वार्थ, अहंकार, मत्सर....कितीतरी छटा आहेत स्त्रीरूपाला. बऱ्या-वाईट दोन्हीही. परंतु , या सगळ्यात एक गोष्ट मात्र समान आहे. कोणतीही स्त्री मग ती कशीही असो , अंततः आहे लढवय्यी...रणांगणात उभारून संकटांचा धैर्याने संहार करणारी....परिस्थितीला हार न मानणारी....

             रावणाने शिव शंकरांना प्रसन्न करून त्यांच्याकडून आत्मलिंग आणि त्रिलोकात सुंदर स्त्री वरदानरुपात मागितली. आता त्रिलोकात सुंदर स्त्री देवी पार्वतीशिवाय कोण? भोळ्यासांब महादेवांनी आनंदाने पार्वतीला वरदान म्हणून देवून टाकले. रावण पार्वती  मातेला घेवून निघाला. तेव्हा हतबल होवून देवीने श्री विष्णूंचा धावा केलाआणि  विष्णूंनी वृद्ध व्यक्तीचे रूप घेऊन मातेची हुशारीने सुटका केली.
            
                           जेव्हा दैत्य महिषासुराच्या त्रासाने सारी सृष्टी त्रस्त झाली आणि त्या दैत्यापुढे सारे देवगण हतबल झाले , तेव्हा ब्रम्हा,विष्णू ,शिवासहित सारे देव त्याच पार्वती मातेला शरण गेले. मग साऱ्या सृष्टीच्या रक्षणासाठी आदिशक्ती दुर्गेचे रूप घेऊन महिषासुर आणि त्याच्या सैन्याशी नऊ दिवस झुंजली.आपल्या मुला-बाळांच्या रक्षणासाठी. 

                                             
            खरे तर , या पुराणकालीन गोष्टींवर कोणी किती विश्वास ठेवावा , त्या खऱ्या मानाव्यात कि नाही हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न! परंतु , यातील नारीशाक्तीचे रूप मात्र निर्विवाद सत्यच!!!
                  
               या दोन्ही कथा जेव्हा मी ऐकते , वाचते ....दोन्हीमधील  विरोधाभास जाणवून येतो. पहिल्या प्रसंगात स्वतःच्या रक्षणासाठी असफल ठरलेल्या पार्वती मातेनेच नंतर साऱ्या देवतांचे आणि सृष्टीचे रक्षण केले.ज्या श्री विष्णूंनी त्यांचे रक्षण केले होते त्यांनीच भवानी मातेला सृष्टीचे रक्षण करण्याची प्रार्थना केली.पण हीच तर नारी शक्तीची खरी गंमत आहे. जी नारी, कधी कधी स्वतःचे रक्षण करण्यासाठी असमर्थ ठरते तीच आपल्या मुला-बाळांवर किंवा परिवारावर संकट आले तर मात्र रणरागिणी चंडीकेचे रूप धारण करते. आपली शक्ती , आपला पराक्रम स्वतःसाठी न वापरता आपल्या लेकरांसाठी , घरादारासाठी वापरण्यातच तिला अधिक धन्यता वाटते. आजच्या जगातही कदाचित घरात होणाऱ्या छळाला, स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराला ती अबला बनून मूकपणे सहन करेल  पण जर तीच वेळ तिच्या लेकरांवर आली तर मात्र आपले कोमल रूप सोडून कालीचा अवतार धारण करण्यास ती मागे पुढे पाहणार नाही. 

               
                       
                            आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी सिंहावर आरूढ झालेल्या , हातात आयुधे घेतलेल्या, रौद्र रूप धारण केलेल्या दुर्गा मातेच्या  मूर्तीसमोर मी जेव्हा नतमस्तक होते ; तेव्हा ... आपल्या लहानग्या मुलीचे एका बिबट्यापासून रक्षण करण्यासाठी केवळ एका काठीच्या सहाय्याने झुंजणाऱ्या मातेचे मला दर्शन होते....आपल्या आई-वडिलांच्या रक्षणासाठी घरात घुसलेल्या आतंकवाद्यांचा धाडसाने मुकाबला करणाऱ्या त्या काश्मिरी मुलीचे दर्शन होते ....परिस्थितीला हार जाऊन  आत्महत्त्या करणाऱ्या आपल्या शेतकरी पतीच्या साऱ्या जबाबदाऱ्या आपल्या शिरावर उचलून  जगाला धीराने तोंड देणाऱ्या पत्नीचे दर्शन होते.....

        आज काळ बदलला आहे. 'त्याग' हेच स्त्रीचे जीवन मानणाऱ्या युगाला दूर लोटून स्त्रिया खूप पुढे निघून आल्या आहेत. आपल्या हक्कांसाठी जागरूक झाल्या आहेत. त्यांना आत्मभान आले आहे... या साऱ्या प्रवासात त्यांच्यात अनेक बरे-वाईट बदल झाले असतील परंतु, आजही स्त्रीची एक गोष्ट मात्र कायम आहे...तिचा लढाऊ बाणा, धीरोदात्तपणा. अनादी काळापासून स्त्री एक खरी लढवय्यी होती आणि आजही आहे. भविष्यातही  कायम असेल. आपल्या पूर्वजांना कदाचित याची जाणीव तेव्हाच झाली असावी. म्हणूनच स्त्रीच्या इतर कोणत्याही रूपापेक्षा तिच्या शाश्वत झुंजार रूपाचे त्यांनी पूजन केले....नवरात्रीचा सोहळा केला  तो आदिशक्ती, महानारी समरांगिनी दुर्गा मातेच्या शौर्याच्या , पराक्रमाच्या कौतुकासाठी!!!

                          
                                                                                                                                                                                     
                                          
       
                                   या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता | 
                     नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || 
                              

५ ऑक्टोबर, २०१२

कम्फर्ट झोन

            माझ्या ओळखीचे एक सद्गृहुस्थ आहेत. त्यांना मी माझ्या कामाच्या ठिकाणी अनेक वेळा पहिले आहे. अतिशय शांत, मोजून-मापून शब्द वापरणारा माणूस! पण, जेव्हा काही कार्यक्रमामध्ये त्यांची भेट झाली तेव्हा मात्र मी चकितच झाले. सर्वांमध्ये हसत खेळत बोलणारा हा माणूस माझ्या ओळखीचा आहे का असा प्रश्न मला पडला. कारण, एकाच दिवशी ते इतके सगळे शब्द बोलू शकतात हे मला पहिल्यांदाच कळले होते. अगदी फिल्मी स्टाईलमध्ये 'कही कुंभ के मेले में बीछडे जुडवा भाई तो नही?' असा प्रश्न मला पडावा इतके त्यांचे वागणे विरुद्ध होते आणि एकाच माणसाचे दोन वेगवेगळे स्वभाव कसे असू शकतात याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत होते.
               
                     पण, मी लक्ष देवून बघितल्यानंतर असे बरेचसे लोक माझ्या आजूबाजूला  आढळले.कोणी आपल्या मित्र-मैत्रिणी बरोबर अगदी मोकळेपाने बोलतात पण इतर ठिकाणी मात्र तो मोकळेपणा हरवून जातो; कोणी घराबाहेर पडले की बटन दाबल्यासारखे दंग-मस्तीची ट्यून पकडतात तर कोणी फक्त घरातच राजे असतात. काही जण सहलीला गेले कि दिल खोलके जगतील परंतु, परत आले की सहलीत भेटलेला माणूस हाच का असा प्रश्न पडेल इतके जीवनाशी बेसूर होतील.....
                   
                  माझ्या  वाचनात एकदा आले होते , प्रत्येक माणसाचा स्वतःचा एक कम्फर्ट झोन असतो.त्यामध्ये प्रत्येकजण स्वतःला सुरक्षित समजून मोकळेपणाने  जगत असतो.या कम्फर्ट झोनमध्ये काही ठिकाणे असतात , काही माणसे आणि  काही भूतकाळातल्या घटनाही असू शकतात ज्या आठवून आपल्याला बरे वाटते. काही गोष्टी किंवा  काही ठिकाणे ही आपल्या या कम्फर्ट झोनच्या बाहेर असतात; जिथे वावरताना आपल्या मनावर नकळत दडपण येत. अशा ठिकाणी जरी आपली इच्छा असली तरीही तो खुलेपणा वागण्यात नाही येवू शकत. आणि हे सगळ जाणून-बुजून कुठे होत असतं की जे आपल्या लक्षात येईल? सगळ काही  आपल्याही नकळत घडत असतं.


              
           हे सगळ बोलायला कस अगदी रंजक वाटत पण ते तितकच समजायला कठीण आणि जाणून घ्यायला अवघड आहे. या आपल्या कम्फर्ट झोनचा जो मनातला कप्पा असतो त्याची आपल्याला कधी जाणीवही नसते. जरी झाली तरी तिकडे लक्ष देण आपल्याला महत्वाच वाटत नाही  किंवा तेवढा वेळ नसतो आपल्याकडे.
           
                       काय असेल या कम्फर्ट झोनच्या अंधाऱ्या गुहेतील रहस्य? मी जेवढा विचार केला तेवढ मला वाटल की ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात त्यांचा परिणाम होतोच आपल्या मनावर! अशीच एखादी गोष्ट असावी जी बीज बनून मनात रुजली जात असेल. त्याला नकारात्मक विचारांचे खतपाणी मिळाले की बघता बघता त्या बी चे  वटवृक्षात कधी रुपांतर होते कळतच नाही. हा असुरक्षिततेचा वटवृक्ष एकदा फोफावला की ती संबंधित गोष्ट किंवा ठिकाण आपल्या त्या कम्फर्ट झोनच्या कधी बाहेर जाते हे आपल्याला कळतसुद्धा नाही. या सगळ्याच हेच एकमेव कारण असेल असंच काही नाही पण मला सुचलेलं आणि पटलेलं एकंच. 
         
           पण , तरीही काही  प्रश्न मात्र उरलेच आहेत. हा कम्फर्ट झोने बदलता येतो कात्याबाहेर असलेल्या गोष्टी लक्ष्मण-रेषेच्या आत घेता येतात का? माझ उत्तर तरी हो आहे. आणि ते माझ्या अनुभवावरून मला सापडलं आहे....लहानपणी मला कोणी कुणाच्या लग्नाला चल म्हटलं तर अगदी जीवावर यायचं. बाकीचा कोणताही समारंभ असेल तर मी सगळ्यात आधी पुढे असायचे पण एकंदर हा लग्न प्रकार मात्र माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचा होता. तिथे गेले की इतर वेळी सगळ्यांच्यात मिळून मिसळून असणारी, दंग-मस्ती करणारी मी कुठेतरी आत बंद व्हायची. तिथे जर मला कोणी भेटले तर मी पण हसून प्रतिसाद द्यायचे पण अगदी मोघम आणि स्वतःहून तर कधीच कोणाशी बोलायला जायचे नाही. त्यामुळे कोणाच्या तरी लग्नात जे मला पहिल्यांदा भेटले असतील त्यांचा माझ्याविषयी एक शांत, न बोलणारी, लोकांमध्ये न मिसळणारी मुलगी असा गैरसमज सहजच झाला असेल. जर कधी त्यांनी मला बाकीच्या समारंभात पाहिलं तर मात्र सगळ्यांशी हसून-खेळून बोलणारी मुलगी हीच ती होती  का असा प्रश्न त्यांना नक्कीच पडला असेल. का माहिती नाही पण त्या वेळी मात्र लग्नाच्या ओळखी-अनोळखी गर्दीचा भाग होऊन राहणे मला काहीसे न रुचणारे होते. पण, हळूहळू ते बदलत गेले. लग्नाच्या आनंदी वातावरणात रमून जाणे माझ्या कम्फर्ट झोनच्या यादीत कधी सामील झाले ते माझे मलाही कळले नाही. माझ्या त्या बंद कप्प्याचे दार कधी आणि कसे उघडले हे मात्र मला आता आठवत नाही .

                        या सगळ्या गोष्टींचा विचार करताना माझ्या लक्षात आले की प्रत्येक माणसाचा कम्फर्ट झोन हा वेगळा असतो. अगदी एकाच कुटुंबातील दोन  माणसांचाही... प्रत्येकाच्या मनाचा हा कप्पा त्याच्या त्याच्या स्वभावानुसार , आवडी-निवडीनुसार ठरत असावा बहुतेक ! आणि वेळेनुसार त्यात बदलही घडून येवू शकतो हे स्वानुभवावरून मी तरी म्हणू शकते.
               
                  या गोष्टींचा आपण कधी जाणीवपूर्वक विचारच करत नाही. जर कधी केला तर आपल्याला कळू शकतील अशा गोष्टी ज्या आपण खुल्या मनाने  उपभोगल्याच नाहीत. त्यामागे दडलेली कारणे, घटना शोधू शकू आपण. जर काही नकारात्मक विचार , असुरक्षिततेची भावना असेल तर त्यांना काढून टाकू शकू........काय साध्य होईल या सगळ्यातून? कदाचित आपण अशा काही गोष्टी करू शकू  ज्या कधीच केल्या नाहीत आजपर्यंत ....कुठली तरी नवीन संधी मिळेल आपल्याला जी आजपर्यंत आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होती.

                      "जिंदगी न मिलेगी दोबारा' चित्रपट आठवतोय? हेच तर केल त्या  तिघांनी त्यामध्ये....प्रत्येकाने अशी गोष्ट शोधून काढली जी त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होती. मग धाडसी खेळ असुदे किंवा आपल्या  भावनांचा स्वीकार .. जस की ह्रितिकला कळाल की आजपर्यंत पैसे कमवण्याबाहेर आयुष्य जगण त्याला कधी जमलच नाही....किंवा मग अभय च उदाहरण.....त्याला कळाल होत की त्याला जशा मुलीशी लग्न करायचं होत तशी त्याची होणारी बायको नाही आहे. पण हे तो फक्त तिलाच न्हवे तर स्वतःलाही सांगायला घाबरत होता. शेवटी जेव्हा त्यांनी ह्या गोष्टी स्वतःशीच कबूल केल्या तेव्हाच ते बाहेर आले आपल्या झोन मधून......नवीन आयुष्य जगायला ......


         
             तुम्हीही शोध अशा गोष्टी ज्या तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहेत. त्या तशा का आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आपल्या मनाचे हे बंद खण उघडता येतील का? करून तरी पहा ...कदाचित तुम्हाला अशा काही प्रश्नांचीही उत्तरे सापडतील जे आपल्याला अजून कधी पडलेच नाहीत.........................